राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी पंधरा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले व मतदानाची आकडेवारी तसेच पक्षांतर्गत अहवाल ध्यानात घेता पंधरापैकी नऊ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल व भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडले जातील, असा विश्वास प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
माधव भांडारी यांनी सांगितले की, गुरुवारी मतदान झालेल्या जिल्हा परिषदांपैकी विदर्भातील सर्व पाचही जिल्ह्यात भाजपाची स्थिती चांगली असेल. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल तर गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपाला अनुकूल झाले असल्याची पक्षाची खात्री आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल अशी खात्री आहे. मराठवाड्यातील ऊर्वरित चार जिल्ह्यात भाजपाच्या जागांमध्ये भरघोस वाढ झालेली दिसेल. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा परिषद भाजपा स्वबळावर जिंकेल असे मतदानावरून दिसते. मतदानाची आकडेवारी पाहता अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला यावेळी संख्याबळात भरघोस वाढ होण्याची अपेक्षा आहे.
त्यांनी सांगितले की, काल पंधरा जिल्ह्यात सरासरी सत्तर टक्के असे चांगले मतदान झाले. गडचिरोलीमध्ये जनतेने नक्षलवाद्यांच्या दहशतवादाला धुडकावून मतदान केले. ही घडामोड सरकारच्या कामावरील विश्वास दर्शविणारी आहे.